Tuesday, April 14, 2015

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर नि गोसंरक्षण



आज महामानव डाॅ. बाबासाहेबांची जयंती ! विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्यसंपन्नता हीच ज्यांची गुणवैशिष्ट्ये ते बाबासाहेब ! हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये ज्या स्त्री-पुरुषांनी जीवनभर व्रतस्थ राहून विद्वत्ता नि व्यासंगाची आराधना केली, त्यात बाबासाहेबांचं नाव अग्रगण्याने घ्यावं लागेल. बाबासाहेबांचा व्यासंग हा चौफेर होता. हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी त्यांनी प्रकट केलेलं चिंतन अतिशय चिंतनीय आहे. ते स्पष्टपणे म्हणतात

"हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज आहेत. पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी म्हटलेले आहे की हिॅदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता. प्राचीन भारतीयांनी केवळ तत्वज्ञान, धर्म अध्यात्म यांविषयी लिहिण्याकडेच लक्ष दिले होते व ते इतिहासापासून राजकारणापासून साफ अलिप्त होते. असेही म्हणतात की हिॅदी जीवन व समाज एका ठराविक पोलादी चोकटीमध्येच फिरत आहेत व त्या चौकटीचे वर्णन केले इतिहासकाराचे काम संपले ! हिंदुस्थानचा प्राचीन काळचा इतिहास अभ्यासल्यानंतर माझे मत मात्र ह्या विद्वानांहूनही अगदी निराळे आहे. ह्या अभ्यासांत मला आढळून आले आहे की, जगांत कुठल्याही देशांत हिंदुस्थानसारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बहुधा एकच देश असा आहे की जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती." - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

 काही महिन्यापूर्वीच महाराष्ट्रात गोहत्या बंदी अधिनियम करण्यात आला. त्यावर अनेकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यामुळे ह्या बाबतीत आपल्या संविधानाचे निर्माते महामानव डाॅ. बाबासाहेब ह्यांचे विचार काय आहेत हे पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच ! 




गोसंरक्षण???  होय गोसंरक्षण ! 

साम्यवाद्यांनी नि ब्रिटीशांनी हिंदुस्थानच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे जे निंदनीय प्रयत्न केले, त्याला वाचा फोडण्याचे कार्य ज्या ज्या पुरुषांनी केलं त्यात बाबासाहेबदेखील येतात. गोहत्येचं मुळ भारतात ब्रिटीशांनीच रोविलं ह्याचे ठसठशीत पुरावे आज उपलब्ध आहेत. जिज्ञासुंनी एक गांधीवादी विचारक नि इतिहाससंशोधक प्राध्यापक धर्मपाल ह्यांनी ह्या बाबतीत विलक्षण अभ्यास करून ज्या ग्रंथाची निर्मिती केली आहे, तो "भारतीय गोहत्येचं मुळ ब्रिटीश काळात" ग्रंथ वाचावा. बाबासाहेबांनी पण गोसंरक्षण ह्या विषयांवर असंच संशोधन केलं होतं नि त्यांच्या प्रबंधातही त्यांनी ते प्रकट केलंय. १९४८ साली त्यांनी लिहिलेल्या "The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables” (1948), ह्या ग्रंथात ह्या संदर्भात चिंतन प्रकट केलं आहेच. पण तंस जरी असलं तरीही ह्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. बुद्धिझम असो की वैदिक संस्कृती असो, ह्या दोन्हींनीही गोहत्येचा निषेधच केलाय. वस्तुत: बाबासाहेब तर स्पष्टच सांगतात की गोहत्येच्या विरोधात बुद्धांनीच ठोस पाउलं उचलली आहेत. ते स्पष्ट म्हणतात
“The Buddhists rejected … animal sacrifice, particularly of the cow. The objection to the sacrifice of the cow had taken a strong hold of the minds of the masses as they were an agricultural population and the cow was a very useful animal.”
घटनेचे मुख्य शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी गोपुजनाचे सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक महत्व ओळखलं होतं. त्यांच्या त्याच प्रबंधात ते म्हणतात
“The Hindoo devotion to the Cow has been an enigma to most of the foreigners and above all has been an efficient lore in the hands of those half-baked theological failures who go to India to conduct their missionary propaganda for blackmailing the Hindoo. The origin of cow worship is as much economic as that Roman practice of not offering wine to the Gods from unpruned vines. The cow and for that matter all draft animals, is the soul of the farmers. The cow gives birth to oxen which are absolutely necessary to the cultivation of the farm. If we kill the cow for meat, we jeopardize our agricultural prosperity. With full foresight, the ancient Hindoos tabooed cow-flesh and thus prevented cow killing.” 
भारतीय संविधान नि गोसंरक्षण 
आता आपण ह्याबाबतीत संविधान काय म्हणते ते पाहु. बाबासाहेब हे संविधानाचे लेखक असल्याने त्यांनी संविधानात गोसंरक्षणासंदर्भात ह्यासंदर्भातली तरतुद दूरदृष्टीनेच करून ठेवली होती. ज्यांनी संविधान वाचलं असेल त्यांना हे माहिती असेल की संविधानाने प्रत्येक नागरिकाला काही मुलभूत अधिकार (Fundamental Rights) दिले आहेत. इतकंच नव्हे तर त्याचबरोबर काही दायित्वही पार पाडण्यास सांगितली आहेत ज्यांना आपण मुलभूत दायित्व (Fundamental Duties) असं म्हणतो. उदाहरणार्थ राष्ट्रध्वजाचा मान राखणे वगैरे. आता हे सर्व सांगत असताना ह्या मुलभूत अधिकार नि दायित्वांबरोबरच काही मार्गदर्शक तत्वे (Directive Principles of State Policy) सुद्धा सांगितली आहेत. ह्याच तत्वांमध्ये प्रस्तुत विषयासंदर्भात खालील मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलं आहे.
The Directive Principle -Article 48 of the Constitution states that
“The State shall endeavor to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and in particular take steps for preserving and improving the breeds and prohibiting the slaughter of cows and other milch and draught cattle. “
 म्हणजे वरील तत्व बाबासाहेबांच्या मनातलेच हेतु स्पष्ट करते. सावरकरांनी देखील ह्याच दृष्टिकोनातून गोसंरक्षण मांडलं आहे. पण त्यांच्या त्या लेखाचा खुप चुकीचा नि सोयीनुसार अर्थ घेउन सावरकरांना गोहत्येचे समर्थक समजण्याची घोडचुक करतात. मागे मी त्यासंदर्भात एक लेख लिहिला होताच ज्यामध्ये मी सावरकर हे कसे गोसंरक्षक आहेत असं दाखवलं होतं. त्यामुळे बाबासाहेब नि गोसंरक्षण हा विषय इथेच स्पष्ट होतो. थोडक्यात काय तर घटनाकार देखील जो विषय ठासून मांडतात तो विषय आम्ही मात्र केवळ धार्मिक दृष्टिकोनातून किंवा अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच पाहतोय असं दर्शवून आम्ही आमचाच घात करून घेतो आहोत. कारण बाबासाहेब किंवा इतरही घटनेचे समर्थक जेंव्हा हा विषय मार्गदर्शक तत्व म्हणून संविधानात मांडतात तेंव्हा नक्कीच त्यामागची आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय नि इतर अनेक गोष्टी लक्षात घेउनच हे तत्व त्यांनी मांडलं असावं. शंकेला जागा असायचं कारणच नाही.

गोहत्याबंदीला विरोध म्हणजे संविधानाला विरोध   

गोहत्याबंदीला विरोध करणार्यांनी एकदा तरी संविधान वाचावं किंवा मार्गदर्शक तत्वे तरी वाचावीत. केवळ चित्रपटकलाकार किंवा अन्य कुणीतरी म्हणतंय म्हणूनच गोहत्याबंदी विधेयकाला विरोध करणं किती अव्यवहार्य नि घटनाबाह्य आहे.  केवळ धर्मशास्रांमध्येच गाईचं महत्व आहे असं नाहीतर आपल्या घटनेतदेखील तेच सांगितलं आहे. धर्मशास्त्र नि गोसंरक्षण ह्या विषयांवर लवकरच माझी लेखमाला प्रकाशित होईल. तेंव्हा आतातरी विरोधकांनी शहाणं व्हावं नि सरकारच्या निर्णयाचं स्वागत करावं ही विनंती ! 

शेवट बाबासाहेबांच्याच वाक्यात करतो


We are Indians first and foremost. We should always be proud of our Indianhood. So nothing under the sun can stop us from becoming a superpower. -Dr. B R Ambedkar

थोर इतिहासकार, तत्वचिंतक, जलतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, प्रज्ञासूर्य, घटनाकर्ते महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!! 



Saturday, April 4, 2015

हनुमान जयंती निमित्त हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाचं एक चिंतन





अश्वत्थामा बलिर्व्यासौ हनुमानश्च विभीषण: !
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: !!

आज हनुमान जयंती. सप्तचिरंजीवांपैकी एक म्हणजे वीर हनुमंत ! नुकतीच रामनवमी साजरी झाली. खरंतर महाबली नि अतुलपराक्रमी नि आजीवन अखंड ब्रम्हचारी अशा श्रीरामचंद्रभक्त  अंजनेय हनुमंताचं चरित्र आम्हांस ज्ञात आहेच पण तरीही त्या नरश्रेष्ठाचं व्यक्तिमत्व नक्की कसं होतं ह्याविषयी रामायणात फार विलोभनीय नि विलक्षण चिंतनीय असं वर्णन आलं आहे. आजकाल व्यक्तिमत्व विकास(Personality Development) हा एक परवलीचा शब्द झाला आहे. अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील ह्याची प्रचंड आवड किंवा आंग्लभाषेतल्या शब्दाप्रमाणे "क्रेझ"आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ह्या व्यक्तिमत्व विकासासाठी हजारो रुपयाचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचं चरित्र वाचलं तरी ही आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल नि व्यक्तिमत्व कसं असावं ह्याचं उत्तम उदाहरण हनुमंताच्या नि रामचंद्राच्या चिंतनातून नि कार्यातून आपल्याला पहायला मिळेलं. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

रामायणातले किष्किंधा कांड सांगते की मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे सीतेच्या हरणानंतर कबंधाच्या सुचनेनुसार सुग्रीवाचा शोध घेत असताना ऋष्यमुख पर्वतावर आले. तेंव्हा वालीच्या भयाने राज्यापासून दूर असेला सुग्रीव हा ह्या दोन नरश्रेष्ठांना पाहून किंचित आश्चर्यचकित नि शंकामग्न होउन थोड्या भयानेच का होईना पण आपल्या हनुमंत नावाच्या मंत्र्यांस ह्या दोन राजकुमारांची पारख करण्यास पाठवतो. तेंव्हा हनुमंत हे एका ब्राम्हणाचं रुप घेउन राम-लक्ष्मणांना भेटावयांस येतात नि त्यांस आत्मपरिचय देउन त्यांचा परिचय वगैरे विचारतात. हनुमंतांचं रामाबरोबरचे ते संभाषण जरी वाचलं तर हनुमंतांच्या बुद्धिमत्तेचं दर्शन तर घडतंच पण त्यापेक्षाही एक दुत म्हणून कसं बोलावं ह्याचा एक आदर्शही प्रकट होतो. हनुमंताचं ते सुमधुर बोलणं ऐकल्यावर श्रीरामचंद्र लक्ष्मणांस हनुमंताचं जे वर्णन करतात ते खालीलप्रमाणे आहे. आणि हेच आजचा आपला चिंतनाचा विषय आहे. श्रीरामचंद्र प्रभु म्हणतात की

नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेदधारिणम् ! 
नासामवेदविदुष: शक्यमेवं विभाषितुम् !! २८ !!

अर्थ - ज्याला ऋग्वेदाचं शिक्षण मिळालेलं नाही, ज्यानं यजुर्वेदाचा अभ्यास केला नाही, जो सामवेदाचा विद्वान नाही, तो याप्रकारे सुंदर भाषेत वार्तालाप करु शकणार नाही ! 

नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् ! 
बहु व्याहरतानेन न किंचिदपशाब्दितम् !! २९ !!

अर्थ - निश्तितपणानं ह्या हनुमंताने सर्व व्याकरणाचा अनेक वेळा बारकाईनं अभ्यास केला आहे. कारण इतका वेळ बोलत असुनही त्याच्या तोंडातून एकही अशुद्ध बोल बाहेर पडला नाही !

न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भ्रूवोस्तथा ! 
अन्येष्वपि च सर्वेषु दोष: संविदित: क्वचित् !! ३० !!

अर्थ - संभाषणाच्या वेळी ह्याचे मुख, डोळे, कपाळ, भूवई तसेच अन्य सर्व अंगामधूनही एखादा दोष प्रकट झालेला आहे असं मला दिसला नाही !

अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्ययम् ! 
उर:स्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् !! ३१ !!

अर्थ - यानं थोडक्यात पण अगदी स्पष्टपणं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. ते समजण्यास नि:संदिग्ध होतं. थांबुन थांबुन किंवा शब्द आणि अक्षरे तोडून कुठलंही वाक्य त्यानं उच्चारलं नाही. कुठलंही वाक्य कर्णकटु वाटलं नाही. त्याची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने स्थिर झाली आहे आणि कंठातून वैखरी रुपाने प्रकट झाली आहे !

संस्कारक्रमसम्पन्नामद्भुतामविलम्बिताम् !
उच्चारयति कल्याणी वाचं ह्रदयहर्षिणीम् !! ३२ !!

अर्थ - बोलताना याचा आवाज फार बारीकही येत नाही नि फार वरही जात नाही. मध्यम आवाजात त्यानं सर्व काही सांगितलं आहे !

अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यंजनस्थया ! 
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि !! ३३ !!

अर्थ - ह्रदय कंठ आणि मुर्धा ह्या या तीन स्थानांकडून स्पष्ट रुपानं अभिव्यक्त होणारी ह्याची ही चित्रवतवाणी ऐकुन कुणाचं चित्त प्रसन्न होणार नाही. वध करण्या साठी म्हणून तलवार उचललेल्या शत्रुचं ह्रदय देखील ह्या वाणीनं बदलु शकेल !

एवंविधो यस्य दुतो न भवेत् पार्थिवस्य तु ! 
सिद्ध्यन्ति हि कथं तस्य कार्याणां गतयोsनघ !! ३४ !! 

अर्थ - हे निष्पाप लक्ष्मणा, ज्या राजांपाशी ह्यासारखे दुत नसतील, त्यांची कार्य सिद्धी कशी होउ शकेल बरे??? 

किष्किंधा कांड - वाल्मिकी रामायण - सर्ग तीन -  श्लोक संख्या २८ ते ३४

प्रत्यक्ष श्रीरामचंद्राच्या तोंडुन पहिल्याच भेटीत हनुमंताबद्दलचं हे चिंतन ऐकल्यावर हनुमंताचं व्यक्तिमत्व किती विलक्षण प्रभावशाली असेल ह्याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. पहिल्याच भेटीत श्रीरामचंद्र हे बोलतात ! काय आश्चर्य आहे ! 

बुद्धिमतां वरिष्ठं अशा हनुमंतांनी सर्व वेदांचा सुक्ष्म रीतीने अभ्यास केला होता नि त्यांचं आचरण पण तसंच होतं. व्याकरणाचा पण त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे वानर देखील त्यावेळी वेदांचा अभ्यास करत होते. मग तथाकथित स्त्री-क्षुद्रांना नि तथाकथित बहुजन समाजाला वेद नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे??? किती दिवस आम्ही हा खोटी धारणा बाळगणार आहोत की हिंदु धर्मात वेदांचा अभ्यास फक्त विशिष्ट जातींपुरता होता नि आहे म्हणून???

रामचंद्रांचा देखील वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास होता नि ते देखील त्यात पारंगत असुन रत्नपारखी होते हे किती विलक्षण आहे. असो ! पुढे श्रीरामचंद्र म्हणतात की हनुमंत हे बोलताना कुठेही तुटकतुटक किंवा असंबद्ध किंवा अशुद्ध बोलत नाहीत. चेहरा किंवा अंगप्रत्यंगावरचे हावभाव किंवा हालचाल देखील किती आदर्श नि आचरणीय आहे.

हनुमंताची वाणी ह्रदयात मध्यमारुपाने नि कंठात वैखरी रुपाने स्थिर आहे कारण योगशास्त्रानुसार वाणीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मध्यमा, वैखरी, परा नि पश्यंती असे प्रकार आहेत. त्यातही हनुमंत हे पारंगत आहेत हे सिद्ध होतं. कारण त्यांचा आवाजही फार वर किंवा खाली नसुन मध्यम होता. त्यामुळे श्रीरामचंद्र म्हणतात की ह्याची वाणी ऐकुन एखादा शस्त्रधारी देखील आपलं शस्त्र खाली ठेवेल. इतकी विलक्षण सुंदर नि कर्णमधुर वाणी हनुमंतांची आहे. असा मंत्री ज्याच्या जवळ असेल त्याची कार्यसिद्धी झाल्याशिवाय राहील का??? 

व्यक्तिमत्वाचं ह्यापेक्षा उत्तम उदाहरण शोधायची आवश्यकता आहे का ??? वेदांचा नि संस्कृत व्याकरणाचा अभ्यास जर वानर देखील करत असतील तर आम्हा मनुष्यांना तो आज का एवढा अस्पृश्य झालाय??? किती करंटे आहोत आम्ही भारतीय??? दुर्दैवी ते आणखी कोण??? 

रामायणात इतर ठिकाणचे वर्णन

मुळ वाल्मीकी रामायणात हनुमंताचे जे वर्णन आले आहे ते वाचले की मन अक्षरश: थक्क होते. ते बुद्धिमतां वरिष्ठं तर आहेतच पण त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा प्रखर इंद्रियसंयम म्हणजे कडकडीत असं आजीवन अखंड ब्रम्हचर्य ! 
ब्रम्हचर्याचं सामर्थ्य हे हनुमंताशिवाय अन्यत्र कुठेच फारसं प्रकट झालेलं नाही. महाभारतातल्या भीष्माचार्यांचं उदाहरण तसं जरी असलं तरीही हनुमंतांचं उदाहरण हे विलक्षण प्रेरणादायी आहे. समर्थ देखील म्हणतात की

मुखी राम त्या काम बाधु शकेना ! 
गुणे इष्ट धारिष्ट्य त्या हे चुकेना ! 
महाभक्त शक्त कामास मारी ! 
जगीं धन्य तो मारुती ब्रम्हचारी !

महर्षी वाल्मिकी स्पष्ट म्हणतात की 

न भुमौ नान्तरिक्षे वा ना नाम्बरे नामरालये ! नाप्सु वा गतिसंगं ते पश्यामि हरीपुंगव: ! 

"मारुतीसारखा कुणी जलचरात नाही, भूमीवर नाही, अंतरिक्षात नाही, अंबरात नाही, स्वर्गा नाही !" 


सुग्रीव सीताशोधाच्यावेळी हनुमंतांना उद्देशुन म्हणतो की

"हे हनुमंता, तुला असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, राजे लोकांचं ज्ञान आहे. लोकपालांसह चौदा भुवने, एकवीस स्वर्गांचे तुला ज्ञान आहे. सागरांसह पर्वताचं तुला ज्ञान आहे. हे मारुती तुझी अकुंठीत गती, तुझा वेग, तेज व स्फुर्ती हे सर्व सद्गुण तुझ्यात परिपुर्ण आहेत. या भुमंडलात तुझ्या सारखा तेजस्वी दुसरा कुणीही नाही."

हनुमंत हे आजीवन अखंड ब्रम्हचारीच ! 

ब्रम्हचर्याचे दोन प्रकार आहेत. एक नैष्ठिक (उपकुर्वाण) ब्रम्हचर्य नि दुसरे गार्हस्थ्य ब्रम्हचर्य ! विवाह करुन देखील केवळ स्वस्त्रीशी तेदेखील शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संसार करणे देखील गार्हस्थ्य ब्रम्हचर्याचे उदाहरण आहे आजीवन अखंड ब्रम्हचारी भीष्माचार्यांनी महाभारतात धर्मराज युधिष्ठिराला उपदेश करताना गार्हस्थ्य ब्रम्हचर्याची व्याख्या सांगितली आहे. असो ! याज्ञवल्क्यस्मृतीमध्ये ब्रम्हचर्याची व्याख्या अशी केली आहे की

कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा !
सर्वत्र मैथुनत्यागौ ब्रम्हचर्यं प्रचक्षते ! 

अंत्यबिंदु निषेकस्तु मैथुनम् !

अथर्वेवेद पण स्पष्ट सांगतो की

ब्रम्हचर्येण तपसा देवा मृत्युमुपाघ्नत ! 
इन्द्रौ हि ब्रम्हचर्येण देवेभ्य: स्वराभरत !
(अथर्ववेद)
(ब्रम्हचर्याच्या जोरावरच देवतांनी मृत्युवर विजय मिळवला. इंद्राने देखील ब्रम्हचर्यानेच देवांचं राजपद मिळवलं)

भगवान शंकर देखील म्हणतात

सिद्धे बिन्दौ महादेवि किं न सिद्ध्यति भूतले ! 
यस्य प्रसादान्महिमा ममाप्येतादृशौ भवेत् !
न तपस्तप इत्याहुर्ब्रम्हचर्यं तपोत्तमम् ! 
उर्ध्वरेता भवेद्यस्तु स देवो न तु मानुष: ! 


ब्रम्हचर्यांचा महिमा यापेक्षा आणखी गायची आवश्यकता आहे काय? हनुमंत हे तर ब्रम्हचर्याचे मुर्तिमंत उदाहरण आहे. कारण रामायणात स्पष्ट उल्लेख आहे की हनुमंत हे जन्मत:च कांसोटा घेउन जन्माला आले होते. ज्ञानोबाराय म्हणतात

कर्मे हनुमंत उदरी कांसोटा ! कर्मे शुकदेव गर्भिकष्टा ! 

तर अशा ह्या नरश्रेष्ठांस कोटी कोटी प्रणाम !!!

महाबली, अतुपराक्रमी पवनसुत अंजनेय श्रीरामदुत हनुमान की जय ! सियांवर श्रीरामचंद्र की जय !! हिंदुधर्मकी जय !!! हिॅदुराष्ट्रकी जय !!! 


तुकाराम चिंचणीकर - ८८८८८३८८६३